78 वा स्वातंत्र्य दिन आयोजनाबाबत शासनाचे महत्वाचे निर्देश सविस्तर वाचा.

78 वा स्वातंत्र्य दिन आयोजनाबाबत शासनाचे महत्वाचे निर्देश काय आहेत याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे.

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत :-

१) राज्यात सर्व विभागीय/जिल्हा/उप विभागीय/तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा.

२) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

३) राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

४) काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे ज्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील.

५) ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वा. च्या पूर्वी किंवा ९.३५ वा.च्या नंतर आयोजित करावा.

६) राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येवून राज्यगीत वाजविण्यात येईल.
७) याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा.

८) संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

हेही वाचा : हर घर तिरंगा हा उपक्रम कसा राबवायचा याबाबत सविस्तर माहिती.

९) समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

१०) दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे :- वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय वाद- विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी / विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखादया विषयाचा Webinar आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

११) राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

१२) राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी- १०९१/३०, दिनांक २० मार्च, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९१ (२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि परिपत्रक क्रमांक एफएलजी १०९८/३४३/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

१३) स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

१४) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. विभागीय आयुक्त, कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मंत्रालय, मुंबई येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

१५) समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१६) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निदेश योग्य प्रकारे पाळण्यात येतील, याची व्यक्तीशः दक्षता घ्यावी.

१७) आचारसंहिता अंमलात असल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी:-

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळ व वेळेमध्ये बदल करण्यात येऊ नये.

ब) कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

क) मा. पालकमंत्री/इतर मान्यवर भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय कुठल्याही पद्धतीने राजकीय असता कामा नये.

Leave a Comment